मुंबई : ‘केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आपण आभारी आहोत. मोदींच्या सूचनेनुसार भाजपचे सरकार कोणताही भेदभाव न करता पारदर्शीपणे जनतेची सेवा करेल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर दानवे यांचे चार जून २०१९ रोजी प्रथमच भाजप प्रदेश कार्यालयात आगमन झाले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांचा सत्कार केला. नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी यांचा या वेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, खासदार संजय पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार तमिळ सेल्वन, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते कांता नलावडे, विश्वास पाठक, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
या वेळी बोलताना दानवे म्हणाले, ‘भाजपने लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजप आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही भेदभाव करणार नाही. शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठी सरकार काम करेल. सामान्य आणि गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढणारे हे सरकार आहे.’
‘लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भ व मराठवाड्यात प्रचार केला; पण तिसऱ्या टप्प्याच्या वेळी आजारपणामुळे आपल्याला स्वत:ला मतदारसंघातही प्रचार करता आला नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक लढवून मला विजयी केले. आपण त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांना चांगला जनादेश देणाऱ्या राज्यातील व देशातील जनतेचेही आपण आभार मानतो,’ असे दानवे म्हणाले.